Header Ads

ad

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची आझाद मैदानातील अनेक आंदोलकांशी चर्चा

मुंबई,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरूवारी आझाद मैदानातील अनेक आंदोलन मंडपात जाऊन आंदोलकांशी चर्चा केली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
विखे पाटील यांनी आदिवासी समाजाच्या लोकसंघर्ष यात्रेत सहभाग घेतला. आदिवासी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत त्यांनी आंदोलनाच्या नेत्या प्रतीभाताई शिंदे यांच्याशी चर्चा करून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
या प्रसंगी विखे पाटील म्हणाले की, यापूर्वीही याच मागण्यांसाठी आदिवासी शेतकर्‍यांचा लाँग मार्च मंत्रालयावर येऊन धडकला होता. त्यावेळी सरकारने लेखी आश्‍वासने देऊनही त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा आदिवासी समाजाला आपल्या हक्कांसाठी सरकारकडे दाद मागावी लागली आहे. आदिवासींच्या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून, यासाठी तुमच्या समवेत कोणत्याही आंदोलनात सहभागी होण्याची तयारी विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दर्शवली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा क्रांतिमोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात मागील तीन दिवसांपासून सभागृहात सुरू असलेल्या चर्चेची माहिती त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याच्या मागणीवर आपण ठाम असून, सरकार जोवर अहवाल सादर करीत नाही, तोवर कामकाज चालू देणार नाही, असेही त्यांनी आंदोलकांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनातही विखे पाटील सहभागी झाले. संघटनेच्या मागण्या त्यांनी जाणून घेतल्या व त्यास आपला पाठिंबा जाहीर केला. भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात शिक्षण विभागाची उदासीनता वेळोवेळी समोर आली असून, शिक्षण मंत्यार्ंचे लक्ष नाही आणि मुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यामुळे प्रश्‍न प्रलंबीत राहत असून, या संघटनेच्या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन विरोधी पक्षनेत्यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलकांचीही त्यांनी आझाद मैदान येथे भेट घेतली. आपण शिक्षण मंत्री असताना ’कायम’ हा शब्द काढण्याचा महत्वपूर्ण घेतला होता. मात्र या सरकारने विनाअनुदानीत संस्थांमधील शिक्षकांच्या समस्यांना गांभिर्याने घेतलेले नाही. राज्यभरातील अन्यायग्रस्त शिक्षक विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. सरकारवरील दबाव अधिक वाढवण्यासाठी या सर्व संघटनांनी एकत्र आले तर अधिक उत्तम होईल, अशी सूचना विखे पाटील यांनी केली. विनाअनुदानित संस्थांच्या शिक्षकांना केवळ काँग्रेस सरकारच्या काळातच न्याय मिळू शकतो, असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.
कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांच्या समस्येसाठी आंदोलन करणार्‍या नागरिकांचीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. या गावांच्या समस्यांबाबत त्यांनी यावेळीही अनेकदा सरकारकडे पाठपुरावा केला आहे. हे सरकार या गावांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र या गावांना न्याय मिळेपयर्ंत आपण पाठपुरावा करीत राहू, असे आश्‍वासन विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दिले.

No comments

Thank you for your feedback.