सरकार विरोधात शेतकर्यांचा एल्गार, आझाद मैदानाकडे कूच
मुंबई 22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)- कर्जबाजारीपणा, दुष्काळाच्या संकटाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबाचे प्रश्न बिकट होत आहेत. या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहे. गुरुवारी पहाटे सोमय्या मैदानातून निघालेला हा मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना झाला आहे. महिला, वृद्ध, लहान मुले यांचा मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभाग आहे.
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आले. या जिल्ह्यातील शेतकर्यांच्या कुटुंबातील महिला मुंबईमध्ये येउन सरकारला शोक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सांगणार आहेत. योजना जाहिर केल्यानंतर सरकारचा या शेतकरी कुटुंबासोबत असणारा संवाद संपतो. त्यामुळे मागे राहिलेल्या शेतकर्यांची अक्षरश: फरफट होते. कुटुंब म्हणून या महिलांना स्थान देण्यात आलेले नाही, हे ‘महाराष्ट्र किसान अधिकार मंच’ आणि ’राज्य महिला आयोगा’ने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. दुष्काळाचे सावट घोंगावत असताना शेती करू पाहणार्या महिलांचे प्रश्न अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मोर्चा निघाला आहे.
Post a Comment