Header Ads

ad

पाण्यापाठोपाठ शेतकर्‍यावर महावितरणचे सुलतानी संकट, शॉर्टसर्किटमुळे 2 एकरमधील ऊस जळून खाक

नांदेड,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
महावितरण कंपनीच्या वीज तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडल्याने जिल्ह्यातील मौजे वाघी येथील शेतकर्‍याचा ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटांबरोबर महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झाला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी हे गाव नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही महिन्यापासून नदीला पाणी नसल्याने या भागातील अनेक शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शेतातील विहिरी व बोअरची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी नदीच्या पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे 90 गावच्या शेतकर्‍यांनी पैनगंगा नदीच्या पात्रात उतरून साखळी पद्धतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, अशातच महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सुलतानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या तारा जमिनीकडे झुकलेल्या आहेत. आज त्याच तारांचा फटका मौजे वाघी येथील शेतकरी शिवाजी धोंडबाराव माने यांना बसला आहे. तारांच्या शॉर्टसर्किटमुळे 2 एकरातील ऊस खाक झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यामुळे महावितरणने घटनेचा पंचनामा करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवदेन शेतकर्‍याने दिले आहे.

No comments

Thank you for your feedback.